मुंबई : अंधेरी पूर्व परिसरात मंगळवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात २६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. मोटारसायकल घसरल्यानंतर ती रस्त्यावर पडली आणि मागून येणाऱ्या बेस्ट बसच्या मागील चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मुंबईतील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मृत महिलेचे नाव आयेशा सलमानी असे असून त्या एका खासगी कंपनीत अकाउंटंट म्हणून कार्यरत होत्या. अपघातावेळी त्या त्यांचे सहकारी आशुतोष सिंग (२८) यांच्या मोटारसायकलवर मागे बसून प्रवास करत होत्या. दोघेही कार्यालयातून घरी निघाले होते. सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास साकीनाका परिसरातील मरोळ मरोशी रोडवर हा अपघात घडला.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोटारसायकल चालकाने अचानक ब्रेक लावल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून बाईक घसरली. अपघातात आशुतोष सिंग डाव्या बाजूला पडले, तर आयेशा सलमानी उजव्या बाजूला रस्त्यावर फेकल्या गेल्या. त्याचवेळी मागून येणाऱ्या बेस्ट बसच्या मागील चाकाखाली त्या आल्याने त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आशुतोष सिंग किरकोळ जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले.
एमआयडीसी पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, “महिला अचानक बससमोर पडल्याने चालकाला तत्काळ प्रतिक्रिया देता आली नाही. परिसरातील नागरिकांनी आरडाओरड करून बस थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चालकाला अपघाताची माहिती मिळाली. चालक घटनास्थळावरून फरार झाला नाही.”
प्रत्यक्षदर्शींनीही पोलिसांना दिलेल्या जबानीत अचानक ब्रेक लागल्यामुळे मोटारसायकलचा तोल गेल्याचे सांगितले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबानीच्या आधारे पोलिसांनी निष्काळजी वाहनचालना केल्याप्रकरणी आशुतोष सिंग यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
सलमानी यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१) अंतर्गत निष्काळजीपणामुळे मृत्यू, कलम १२५(ब) अंतर्गत इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणे आणि कलम २८१ अंतर्गत बेदरकार वाहनचालना याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे, असे हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तात म्हटले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अंधेरी पश्चिममध्ये चार बेस्ट बसच्या साखळी अपघातात बेस्टचे ५२ वर्षीय वाहक शेखर बाबूराव रावते यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अवघ्या सहा दिवसांत घडलेल्या या घटनेमुळे मुंबईतील वाढते रस्ते अपघात, निष्काळजी वाहनचालना आणि सार्वजनिक वाहतूक सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
वाहतूक तज्ज्ञांच्या मते, गर्दीच्या रस्त्यांवर वेग नियंत्रण, सुरक्षित अंतर राखणे आणि अचानक ब्रेक टाळणे याबाबत अधिक जनजागृती होणे आवश्यक आहे. तसेच बेस्ट बस आणि दुचाकीस्वारांसाठी स्वतंत्र सुरक्षा उपाययोजनांचीही गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
