जोगेश्वरी: कोकणवासीयांच्या रेल्वे प्रवासातील अडचणी सोडवण्यासाठी खासदार रविंद्र वायकर यांनी नुकतीच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. प्रवाशांची वाढती गर्दी पाहता, रेल्वे प्रशासन बोरिवली – नायगाव – जुईचंद्रा – दिवा जंक्शन – पनवेल या मार्गे कोकणासाठी गाड्या चालवण्याबाबत प्रयत्नशील आहे. या मार्गामुळे भविष्यात जोगेश्वरी टर्मिनस आणि दादर टर्मिनस येथून देखील गाड्या सुरू करणे शक्य होईल, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. या निर्णयामुळे पश्चिम उपनगरातील लाखो चाकरमान्यांचा प्रवास सुकर होईल.
सोबतच, कोविड काळापासून दिवा येथे थांबवण्यात आलेली ‘दादर-रत्नागिरी पॅसेंजर’ सेवा पुन्हा दादरपर्यंत पूर्ववत करण्यात यावी, यासाठी खासदार वायकरांनी मंत्र्यांना लेखी निवेदन देऊन आग्रही मागणी केली. ”कोकणवासीयांच्या आणि मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातील जनतेच्या हितासाठी माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच राहील,” असे खा. वायकर यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

