सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
तरुणाईचा संघर्ष, शिक्षण व्यवस्थेतील वास्तव आणि सकारात्मक सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा आगामी मराठी चित्रपट ‘आऊट ऑफ सिलॅबस – पुस्तकांच्या पलीकडे’ याचा भव्य विशेष प्रीमियर शो नुकताच आयोजित करण्यात आला. या सोहळ्याकडे चित्रपटसृष्टीसह सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि उद्योग क्षेत्राचे विशेष लक्ष लागले होते. चित्रपटाची संपूर्ण टीम तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थित राहून चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.
अदू तिक्षू प्रॉडक्शन अँड म्युझिक Adu-Tishu Production & Music प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि चित्रपट निर्माते डॉ. सुगत ज्ञानेश्वर वाघमारे यांनी केली असून, आमदार डॉ. संजय कुटे हे चित्रपटाचे सह-निर्माते आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन नवीन देशबोनिया यांनी केले असून, लेखन अनिकेत रामचंद्र कोरडे यांचे आहे. तर चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी अनिल विठ्ठल थोरात यांनी उत्तमरित्या सांभाळली आहे. पुस्तकांच्या चौकटीपलीकडे जाऊन आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देणारा हा चित्रपट तरुण पिढीला प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.
या खास सोहळ्याला चित्रपटातील अजिंक्य राऊत, अद्वयी वाघमारे, शेषपाल गनवीर, अभिजीत रामचंद्र आणि सानिका थोरसकर हे कलाकार उपस्थित होते. कलाकारांनी प्रेक्षकांशी संवाद साधत चित्रपटाच्या निर्मितीतील अनुभवही यावेळी शेअर केले.
या विशेष प्रीमियर सोहळ्याला नॅशनल स्टॉक एक्स्चेंज National Stock Exchange चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आशिष चौहान यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच राजकीय नेते संजय कुटे (जळगाव जामोद), रणधीर सावरकर (अकोला पूर्व), हरीश पिंपळे (मूर्तीजापूर, अकोला), नारायण कुचे (बदनापूर), किसन वानखडे (उमरखेड, यवतमाळ), वसंत खंडेलवाल (वि. प. सदस्य), हेमंत पाटील (नांदेड) आणि श्वेता महाले (चिखली) यांच्यासह चित्रपटसृष्टी, राजकारण, समाजकारण, उद्योग आणि विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.
समाजाभिमुख आशय, प्रेरणादायी कथा आणि तरुणांना नवी दिशा देणारा संदेश यामुळे ‘आऊट ऑफ सिलॅबस – पुस्तकांच्या पलीकडे’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आला आहे. प्रीमियरला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मान्यवरांची उपस्थितीमुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, हा चित्रपट तरुणाईसह सर्व वयोगटातील प्रेक्षकांच्या मनात नक्कीच स्थान निर्माण करेल, असा विश्वास चित्रपटाच्या संपूर्ण टीमने व्यक्त केला आहे.
