प्रवासाचे नियोजन करण्याचे वाहतूक पोलिसांचे आवाहन
मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी घाटकोपर परिसरातील अंधेरी-घाटकोपर लिंक रोडच्या दक्षिण वाहिनीवर वाहतूक निर्बंध जाहीर केले आहेत. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ११.३० वाजेपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
वाहतूक पोलिसांच्या अधिसूचनेनुसार, श्रेयस जंक्शन ते भीमनगर जंक्शन या दरम्यानचा अंधेरी-घाटकोपर लिंक रोडचा दक्षिणेकडील मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहे.
घाटकोपर पश्चिमेकडील साईनाथ नगर, टिळकवाडी येथे मोठ्या दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
श्रेया जंक्शनहून असल्फाच्या दिशेने जाणाऱ्या आणि नेहमी अंधेरी-घाटकोपर लिंक रोडच्या दक्षिण वाहिनीचा वापर करणाऱ्या वाहनचालकांना लाल बहादूर शास्त्री मार्गाच्या दक्षिण वाहिनीने पुढे जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
त्यानंतर सर्वोदय जंक्शनवरून उजवीकडे वळून हिराचंद देसाई रोडमार्गे असल्फा आणि पुढे अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवर जाता येणार आहे.
दहीहंडीच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने घाटकोपर, असल्फा आणि आसपासच्या परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांनी ५ सप्टेंबर रोजी या मार्गावरून प्रवास करताना अतिरिक्त वेळ राखून ठेवावा आणि शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले असल्याचे मिड डे चे वृत्त आहे.
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कार्यक्रमाच्या काळात पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.
टीप: सदर छायाचित्र एआय निर्मित आहे.
