‘अफरातफरी’च्या टिझरने वाढवली उत्सुकता
पैशांसाठी माणूस काय काय करू शकतो, याची गंमतीदार झलक दाखवणारा ‘अफरातफरी’चा टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून या टिझरने प्रेक्षकांची चित्रपटाबद्दची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. शशांक शेंडे, संजय नार्वेकर आणि ओंकार भोजने हे तीन भाऊ, त्यांच्या वडिलांनी काढलेली खास पॉलिसी आणि त्या पॉलिसीमधून मिळणाऱ्या तब्बल एक कोटी रुपयांची रक्कम… या सगळ्याभोवती फिरणाऱ्या गोंधळाची झलक टिझरमध्ये पाहायला मिळते. मिलिंद झुंबर कवडे दिग्दर्शित, अ स्कायलाइन सिनेमॅटिक आणि येन मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत, आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्सच्या सहयोगाने प्रेक्षकांच्या भेटीला येणारा हा धमाल चित्रपट येत्या ९ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘अफरातफरी’च्या टिझरमध्ये शशांक शेंडे, संजय नार्वेकर आणि ओंकार भोजने हे तीन भाऊ दिसत असून त्यांच्या वडिलांनी अशी पॉलिसी काढलेली असते, ज्यानुसार त्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास तिन्ही मुलांना एक कोटी रुपये मिळणार असतात. त्यामुळे वडिलांच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या या मोठ्या रकमेभोवती तिन्ही भावांची विचारांची चक्रं फिरताना दिसतात. एक कोटींची ही रक्कम मिळवण्यासाठी आता या तिघांच्या मनात नेमकं काय सुरू आहे, याची उत्सुकता टिझर निर्माण करतो. विशेष म्हणजे टिझरमध्ये तात्यांचा अपघात होताना दिसतो, तर पुढच्याच दृश्यात त्यांच्या फोटोला हार घातलेला पाहायला मिळतो. त्यामुळे तात्यांचा खरंच अपघाती मृत्यू झाला आहे का? त्यांच्या मृत्यूनंतर तीन भावांना एक कोटी रुपये मिळणार का? आणि या पैशांसाठी या तिघांकडून नेमकी कोणती ‘अफरातफरी’ घडणार आहे? असे अनेक प्रश्न टिझर पाहिल्यानंतर निर्माण होतात. पैशांचे आमिष, तीन भावांची धावपळ आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ यामुळे ‘अफरातफरी’ची कथा भन्नाट मनोरंजनाची मेजवानी देणार असल्याचे दिसते.
‘अफरातफरी’मध्ये मोहन आगाशे, शशांक शेंडे, संजय नार्वेकर, ओंकार भोजने, नेहा खान, प्राजक्ता हनमघर, आसावरी जोशी, हेमंत पाटील, किरण माने आणि कुणाल मेश्राम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दमदार कलाकारांची फौज आणि पैशांभोवती फिरणारी गंमतीदार कथा यामुळे ‘अफरातफरी’चा हा गोंधळ प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाला आहे.
दिग्दर्शक मिलिंद झुंबर कवडे म्हणाले, ” ‘अफरातफरी’ची कथा ही पैशांच्या हव्यासातून निर्माण होणाऱ्या गंमतीदार परिस्थितीभोवती फिरणारी आहे. एका पॉलिसीमुळे तीन भावांच्या आयुष्यात कोणता गोंधळ निर्माण होतो, याची छोटीशी झलक टिझरमधून दाखवली आहे. शशांक शेंडे, संजय नार्वेकर आणि ओंकार भोजने या तिघांची केमिस्ट्री आणि त्यांच्यातून निर्माण होणारे मजेशीर प्रसंग हे या चित्रपटाचं खास आकर्षण आहे. टिझर पाहून प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेले प्रश्न आणि उत्सुकता चित्रपट पाहाताना नक्कीच अधिक वाढेल.”
